सरस्वती महिला शेतकरी गटामार्फत एकत्रित सोयाबीन बियाणे प्रक्रिया; पिंपरी निर्मळ येथे प्रशिक्षण उत्साहात संपन्न



पिंपरी निर्मळ (ता. राहाता) : पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मर कप उपक्रमांतर्गत मौजे पिंपरी निर्मळ येथे सरस्वती महिला शेतकरी गटाच्या वतीने सोयाबीन बियाण्यांची रासायनिक व जैविक प्रक्रिया तसेच प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गटाच्या अध्यक्षा सौ. मीनाताई निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला सदस्यांनी एकत्रित सहभाग घेत बियाणे प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर सदस्यांनी सेंद्रिय व शास्त्रोक्त पद्धतीने एकमेकांच्या घरी जाऊन सोयाबीन बियाण्यांवर प्रत्यक्ष प्रक्रिया करून सामूहिक शेतीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी ट्रायकोडर्मा, बीजामृत, पंचगव्य व गोमूत्र यांच्या साहाय्याने बियाणे प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य बीज प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते, उगवण क्षमता वाढते, मुळांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच बीज प्रक्रिया सकाळी करून बियाणे सावलीतच सुकवावे व पेरणीपूर्वी एक-दोन तास आधीच ही प्रक्रिया करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणी फाउंडेशनचे मेंटर श्री. राजेश पऱ्हे यांनी 'स्मार्ट शेती' ॲपमध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी, अचूक नोंदीचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी आबासाहेब भोरे यांनी सामूहिक शेती आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, "एकत्रितपणे काम केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परस्पर सहकार्यामुळे कोणत्याही संकटाचा सामना करणे अधिक सोपे होते," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास सरस्वती महिला शेतकरी गटातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे शास्त्रोक्त बियाणे प्रक्रिया, सेंद्रिय शेती आणि सामूहिक शेतीच्या संकल्पनेला अधिक बळ मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments