विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिर्डी मतदारसंघ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी

शिर्डी ( प्रतिनिधी)

मराठा आरक्षण, औद्योगिक वसाहत आणि जलयात्रेमुळे विकासाचा वेग वाढला : अभय शेळके

 राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींमध्ये प्रभावी नेतृत्व करत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाला राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांच्यासोबत यशस्वी चर्चा, राहुरी विधानसभा व विधानपरिषद निवडणुकीतील महत्वाची भूमिका, तसेच शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभा राहिलेला देशातील खासगी क्षेत्रातील पहिला तोफगोळे निर्मिती प्रकल्प यामुळे विखे पाटील यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे समोर आले असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना शेळके म्हणाले की, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत विखे पाटील यांनी अनेकवेळा सकारात्मक चर्चा करत तोडगा काढण्याची भूमिका निभावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सुविधा व सवलती लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतानाही विखे पाटील यांनी प्रभावी समन्वय साधत मार्ग काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यामुळे राहुरी मतदारसंघात भाजपचे एक नव्हे तर दोन आमदार निवडून आले. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले यांनीही सार्वजनिकरित्या विखे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे शेळके म्हणाले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची तब्बल ५०० एकर जमीन हस्तांतरित करून विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यात आला. या ठिकाणी देशातील खासगी क्षेत्रातील पहिला तोफगोळे निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे शिर्डी मतदारसंघ राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला.

याच औद्योगिक वसाहतीत टाटा उद्योगसमूहाने कौशल्य विकास प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी काळात या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तब्बल दहा हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.

अभय शेळके (उपनगराध्यक्ष, शिर्डी) म्हणाले :

“जलसंपदा विभागाला लोकाभिमुख करण्याचे काम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. गोदावरी कालवे व वितरिकांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली. गोदा ते नर्मदा जलयात्रा यशस्वी करत पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांनी गती दिली आहे.”

Post a Comment

0 Comments