टाकळी भान प्रतिनिधी:- जन्म देणारी महिला ही मातृशक्ती आहे. पतीचा आधार गमावलेल्या महिलांचे जगणे सुकर होण्यासाठी साऊ एकल महिला समिती प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योजक किशोर निर्मळ यांनी केले.
श्रीरामपूर येथील गंगाधर ओगले साखर कामगार रुग्णालयात राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, जगदंब फाउंडेशन, साखर कामगार रुग्णालय, महालॅब, सेवा नर्सिंग कॉलेज, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साऊ एकल महिला समिती ट्रस्टच्या अध्यक्षा प्रतिमा कुलकर्णी होत्या. 'रयत'च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने, दिनेश चोरडिया, अकोले तालुका समन्वयक वैशाली राजगुरू, भाजप महिला मोर्चाच्या सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या
माध्यमातून आरोग्य सेवा करणारे वडाळा महादेवचे राहुल राऊत व राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, गिरीश गांधी पुरस्काराबद्दल साऊ एकल महिला समितीचे संस्थापक निमंत्रक हेरंब कुलकर्णी, मुंबईचा आचार्य अत्रे कट्टा पुरस्काराबदल प्रतिमा कुलकर्णी यांना या वेळी गौरविण्यात आले. हेरंब कुलकर्णी यांचा सत्कार प्रतिमा कुलकर्णी यांनी स्वीकारला. आरोग्य तपासणीनंतर सहभागी महिलांना विविध आठ प्रकारच्या कडधान्यांचे संच देण्यात आले. समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विद्यार्थीनींना गणवेश वाटप करण्यात आले. कुलकर्णी म्हणाल्या, की जोडीदार गमावल्यामुळे आता तुम्हीच तुमच्या मुला-मुलींचे आई-वडील आहात. मात्र, या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यासाठी तुम्हीही पुढे आले पाहिजे, तरच सर्व एकल महिला एकमेकांच्या साथीने पुढे जाऊ शकतील. समाजाची जाणीव असलेले, कार्यरत साऊ एकल महिला समितीमध्ये आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थीची संख्या वाढली. या योजनेच्या निधीसाठी मिलिंदकुमार साळवे मंत्रालयापर्यंत सतत पाठपुरावा करीत असतात. असे कार्यकर्ते व समिती राज्यातील एकल महिलांसोबत आहे. आम्ही एक पाऊल टाकले, तर तुम्हीदेखील दोन पावले पुढे टाकली पाहिजेत. एकल महिलांनी राजमाता अहिल्यादेवींप्रमाणे वेळप्रसंगी मुलांबाबत कठोर बनून त्यांना शिस्त लावून त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. शिबिरासाठी तालुका समन्वयक दिलीप लोखंडे, बाळासाहेब जपे, शालिनी ससाणे, वंदना काळे, दुर्गा नाटकर, मंजुषा गायकवाड, संगिता कुरूंद आदींनी परिश्रम घेतले. साऊ समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मुकुंद टंकसाळे यांनी सूत्रसंचालन केले, तालुका समन्वयक श्रीकृष्ण बडाख यांनी आभार मानले.
0 Comments