अहिल्यानगर जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार; शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता जनतेच्या प्रश्नांवर आणि शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. पद मिळविण्यासाठी नव्हे, तर पक्षासाठी काम करण्याची मानसिकता प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे, असे आवाहन भाजपा प्रदेशउपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यानगर येथे आयोजित भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे उदाहरण देताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, सरकारने एखादी योजना जाहीर केल्यानंतर केवळ त्याची माहिती देणे पुरेसे नाही. त्या योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या शेतकऱ्याला मिळाला, हे त्याच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे.यावेळी त्यांनी आवर्जून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये सोसायट्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसह लाभाची रक्कम नमूद असलेली पत्रे तयार करून ती प्रत्येक लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. “एखाद्या शेतकऱ्याला दीड-दोन लाख रुपयांचा लाभ मिळत असेल, तर हा लाभ कोणामुळे मिळाला याची जाणीव त्याला करून देणे आवश्यक आहे,असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षाने दिलेली विविध पदे ही केवळ नावापुरती किंवा प्रतिष्ठेसाठी नसून त्यातून पक्षाचे काम झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका डॉ. विखे पाटील यांनी मांडली. जिल्हा नियोजन समितीसह विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना आणि कार्यकारिणीच्या बैठकांना गांभीर्याने उपस्थित राहून आपली सक्रियता दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुकाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, मोर्चांचे पदाधिकारी, सरचिटणीस तसेच बूथस्तरावरील कार्यकर्ते यांचे पक्षासाठीचे योगदान आणि प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. पक्षासाठी वेळ देणाऱ्या आणि स्वतःहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी शेवटी’ हा आहे. मात्र व्यक्तिगत स्वार्थाला पक्षापेक्षा प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढणे योग्य नाही. नेत्यांप्रती वैयक्तिक निष्ठा असली तरी सर्वप्रथम निष्ठा भारतीय जनता पक्षाशी असली पाहिजे, असे डॉ. विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले मंत्रीपद, पालकमंत्रीपद, आमदारकी, खासदारकी किंवा कोणतेही पद पक्षामुळे मिळते. त्यामुळे आपली पहिली निष्ठा पक्षाशी आणि त्यानंतर नेता किंवा लोकप्रतिनिधीशी असली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना बळ देण्याला नेहमीच प्राधान्य दिले. स्वतःला एखादे पद मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो; मात्र आपल्या कार्यकर्त्याला पदावर पोहोचविण्यासाठी आपण त्यापेक्षा कमी प्रयत्नातही समाधान मानले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मी मोठा होण्यापेक्षा माझा कार्यकर्ता मोठा झाला, यातच मला आनंद आहे, असा संदेश देत त्यांनी पदाच्या मागे धावण्यापेक्षा संघटनेत कार्यकर्ते निर्माण करण्याचे आवाहन केले.
अहिल्यानगरच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच
अहिल्यानगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न मांडताना डॉ. विखे पाटील यांनी डिंबे–माणिकडोह बोगदा, कुकडी कालव्यांचे नूतनीकरण आणि साकलाई योजनेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नाला निर्णायक दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुकडी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी मोठ्या निधीची तरतूद होऊन निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया पुढे गेल्याचा उल्लेख करत, आपल्या मुलाबाळांचा आणि आपल्या हक्काच्या पाण्याचा हा प्रश्न आहे. एक पाऊल पुढे टाकले आहे; आता मागे हटायचे नाही,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आल्याचा उल्लेख करत डॉ. विखे पाटील यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे सांगितले. हीच ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. याच ताकदीने आपण लढत राहिलो तर जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी ६० जागा भाजपच्या येतील आणि अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदही भाजपकडे येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे, कार्यकर्त्यांना सन्मान व बळ देणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत वाढविणे, या उद्देशाने सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
बैठकीस दक्षिण अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, अहिल्यानगर शहराध्यक्ष अनिलजी मोहिते, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपमहापौर धनंजय भैय्या जाधव यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, विविध मोर्चा व आघाड्यांचे प्रमुख आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ओबीसी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
0 Comments