फसवणूक करून जमीन हडपणाऱ्या सावकारांवर कारवाई करा- ज्ञानेश्वर अहिरे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

अहिल्यानगर (प्रतिनिधी )

तुटपुंजी रक्कम देऊन व दमबाजी करून खरेदी खतावर सह्या करायला लावून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व बेकायदेशीर जमीन हडप करणाऱ्या सावकारांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यायग्रस्त शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जाईल असा इशारा अ एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे दिला आहे. 
     श्री. अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेजनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सध्या अवैध सावकारांनी उच्छाद मांडला आहे. गरजवंत शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली तुडपुंजी रक्कम द्यायची व या रकमेवर अव्वाच्या सव्वा व्याजदर लावायचा व दुप्पट तिप्पट रक्कम वसूल करायची याच्यावरच न थांबता त्यांच्या जमिनीचे गहाण खत करून घ्यायचे व वेळेत पैसे जर शेतकऱ्याने परत केले नाही तर दमबाजी करून शेतकऱ्यांची जमीन हडप करायची असे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी हडप केल्या आहेत. आणि तक्रार द्यायला जर कोणी समोर आलाच तर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तुझे कागदपत्र आमच्याकडे आहेत आम्ही पोलिसात देऊन तुला जेलमध्ये टाकायला लावू अशी धमकी देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकरी या सावकारांच्या जाचाला बळी पडले आहेत. जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारकीने अनेक कुटुंबे उध्वस्त केली आहेत. आणि विशेष म्हणजे या सावकारांना शासकीय यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकारीच पाठीशी घालत आहेत. या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनी हडपण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.अनेक तक्रारी शासकीय दरबारी दाखल असताना शासन अशा सावकारांवर का कारवाई करत नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मुळात शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यामागे हे सरकारच कारणीभूत आहे की काय ? अशी शंका यायला वाव आहे. ज्यांच्या जमिनी सावकाराने हडप केल्या अशा सर्व शेतकऱ्यांची चौकशी होऊन झालेले खरेदी खत रद्द झाले पाहिजे व या सर्व सावकारांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा शेतकरी देशोधडीला लागायला वेळ लागणार नाही. तरी शासनाने कठोरात कठोर पावले उचलून या अवैध्य सावकारकीच्या मुस्क्या आवळल्या पाहिजे व शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत मिळवून दिली पाहिजे अन्यथा सर्व अन्यायग्रस्त शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जाईल असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments