साई संस्थान व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीड कनेक्टेड रूफ टॉप सोलर पी.व्ही प्रकल्प उभारण्यात येणार! बीपीसीएल कडून चार कोटी 45 लाख रुपयांची मिळणार मदत!



शिर्डी ( राजकुमार गडकरी)- श्री साईबाबा संस्थान तर्फे पर्यावरणपूरक ‘हरित ऊर्जा’ वापर वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून संस्‍थानच्‍या विविध इमारतींच्या छतांवर १७०९.९२ kWp क्षमतेचा ग्रीड-कनेक्टेड रूफटॉप सोलर पीव्ही प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून CSR निधीतून सुमारे ४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत मिळणार असून उर्वरित खर्च संस्थान उचलणार आहे.
या प्रकल्पासाठी संस्थान आणि BPCL यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारावेळी शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, विद्युत विभागाचे प्र. उपकार्यकारी अभियंता किशोर गवळी तसेच संस्थानचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
तसेच BPCL फाउंडेशनच्या वतीने जीएम व सीईओ बिना मनसुख, जीएम (अतिरिक्त प्रभारी CSR) देवेंद्र जोशी, DGM (वित्त CSR) राजेश तिखे, DGM (CSR) संजय यादव, सहायक कार्यकारी व सचिव मुकेश मुनेश्वर, उपमहाव्यवस्थापक एन. मेघनाथन, अभिजीत चव्हाण, महेश एम., राजकुमार मिश्रा, मनोज जाधव व हर्षा बिडावटका उपस्थित होते.
शिर्डी येथे दररोज देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसर, रुग्णालये, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर सुविधांसाठी अखंड वीजपुरवठा आवश्यक ठरतो. वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर संस्थानने ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे पावले उचलली आहेत.
यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सुपा येथील पवनचक्की प्रकल्पातून निर्मित वीज ‘कॅप्टिव्ह ओपन ऍक्सेस’द्वारे संस्थानच्या वापरात आणण्यात आली. या उपक्रमातून जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सुमारे ५ कोटी ६४ लाख रुपयांची वीज बचत झाली आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या CSR निधीतून सुमारे १.२ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प एप्रिल २०२६ अखेर कार्यान्वित होणार असून त्यातून दरवर्षी सुमारे १८ लाख युनिट वीज निर्मिती होऊन अंदाजे २ कोटी ८ लाख रुपयांची बचत अपेक्षित आहे.
BPCL मार्फत उभारण्यात येणारा १.७ मेगावॅट सौर प्रकल्पातुन दरवर्षी सुमारे २६ लाख युनिट वीज निर्मिती होईल. यामुळे अंदाजे २ कोटी ५६ लाख रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय ONGC कडून १.९ मेगावॅट क्षमतेचा ग्राउंड माउंट सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही प्रक्रियेत आहे.
सध्या संस्थानचा एकूण वीज वापर सुमारे ७.९६ मेगावॅट इतका असून प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पवन ऊर्जा, रूफटॉप सोलर आणि ग्राउंड माउंट सोलर यांच्या माध्यमातून सुमारे ७.३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यामुळे संस्थान लवकरच विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असून ‘हरित ऊर्जा’ वापरासाठी श्री साईबाबा संस्थान एक आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments