मंत्रीपद मिळाल्यानंतर जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी केली साई चरणी प्रार्थना-ना. छगन भुजबळ----------------------------------------------ना. भुजबळ यांनी शिर्डीत येऊन घेतले साई दर्शन! संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी) नुकतीच मिळालेली मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना यश मिळावे आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी येथे साई दर्शन घेऊन साईचरणी प्रार्थना केली. असे नुकतेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांनी शिर्डीत सांगितले.मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

साई दर्शनानंतर साई संस्थांनच्या वतीने त्यांचा साई संस्थांनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते. ना. छगन भुजबळ यांनी शिर्डीत माध्यमाशी बोलताना सांगितले की,
आपण मंत्री असो किंवा नसो, लहानपणापासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. काही धार्मिक स्थळं अशी असतात की, तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे. त्यामुळंच आज मी त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आहे. नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावं आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी, साई चरणी प्रार्थना केली, असंही मंत्री ना. छगन भुजबळ यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की "नाशिकच्या पालकमंत्री विषयावर वाद-विवाद वाढवण्याचं काही कारण नाही.
 पालकमंत्री होऊन जनतेची सेवाच करायची असते. पालकमंत्री नसलो तरी, मी जनतेची सेवा करू शकतो. त्यामुळं मला पालकमंत्री पदाच्या वादात पडायची नाही, असे स्पष्ट करत राज्यात एकूण ५४ हजार रेशन दुकानं आहेत. कोरोना काळात सगळे घरात असताना, आमचे हमाल बांधव, चालक आणि संबंधित अधिकारी यांनी अखंडपणे काम केलं. त्या संकटकाळातही ५४ हजार दुकानांमधून गरजूंपर्यंत धान्य पोहोचवण्यात आलं. मात्र, काही दुकानांत गैरव्यवहारही घडत आहेत हे खोटं नाही. जर कुणाला अशा गैरप्रकारांची माहिती असेल तर त्यांनी आम्हाला थेट कळवावं. सामान्य कार्यकर्ते असो किंवा नागरिक जर त्यांनी अशा दुकानांबाबत तक्रार केली तर, आम्ही तत्काळ कारवाई करू," असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले आहे.तर"सुप्रीम कोर्टानं ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिलय. या निर्णयावर समाधान व्यक्त करत भुजबळ म्हणाले, "२७ टक्के आरक्षण मिळाल्यामुळं ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. मात्र या आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र, या आरक्षणात चुकीचा मनुष्य घुसणार नाही, ते जनतेनं ठरवलं पाहिजे," असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
 धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळालं अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राजकारणात आजवर मी दहावेळा मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजकारणात कधी कसं मंत्री पद येतं. कधी कसं जातं. आवक जावक सुरू असते, हे चालूच राहते. असे ना. छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments