संगमनेर दि.११ प्रतिनिधी
तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत,माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला.पन्नास वर्ष सर्व सर्व सतास्थान असताना सुध्दा तुम्हाला जे करता आल नाही, ते पोरा बाळांनीच करून पाणी आल्याच सिध्द करून दाखवल असल्याचा टोला लगावला.
डॉ. विखे पाटील म्हणाले,
“निळवंडे डावा कालवा योजना ३०–४० वर्षांपासून फक्त कागदावर होती. या दरम्यान अनेकदा बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, पण गोरक्षवाडी, संगमनेर आणि आसपासच्या गावांपर्यंत पाण्याचा थेंब पोहोचत नव्हता. जनतेच्या अपेक्षा वारंवार वाढवल्या, पण त्यांची पूर्तता झाली नाही. आज या प्रकल्पामुळे केवळ शेतीसाठीच नाही, तर पिण्यासाठीही भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. हा टप्पा शेतकऱ्यांच्या जीवनमानात क्रांती घडविणारा असल्याचे डॉ विखे म्हणाले.
त्यांनी विरोधकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत म्हटलं,“२५–२५ वर्षे मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही, आणि मतदारसंघात २०० टँकर धावतात.अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच तो बदल घडवला आणि आमदार अमोल खताळ यांना निवडून दिलं. घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता खुश होत नाही.प्रत्यक्ष कामाला तालुक्यात सुरूवात झाली आहे.
डॉ. विखे यांनी पुढे सांगितलं,“भोजापुरचं पाणी नानज दुमाला, तीगाव, सोनोशी पर्यंत पाणी पोहोचवलं. गेली ३० वर्षे हा चमत्कार कुणीच घडवू शकला नव्हता. पण शिस्त, नियोजन आणि कटाक्ष ठेवल्यास अशा योजना पूर्णत्वाला जाऊ शकतात. पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी असल्याचे डॉ विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
या प्रकल्पामागे केंद्र सरकारचा मोठा वाटा असल्याचे सांगून पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या निधीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालं. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या पाठीशी महायुती सरकार ठाम असल्याचा संदेश मिळाला आहे.
जलपूजनानंतर गोरक्षवाडीत जलयात्रा काढण्यात आली. डोल-ताशांच्या गजरात शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.या वेळी ग्रामस्थांनीच विरोधकांवर मिश्कील टिप्पणी केली
डॉ. विखे म्हणाले, “ज्या भागात पाणी आम्ही सोडलं, तिथे विरोधक येऊन काय भाषण करणार?”यावर ग्रामस्थांनी मधेच हशा पिकवत उत्तर दिलं “दादा, विरोधकच येणार नाही!
शेवटी डॉ. विखे म्हणाले,“पाणी देतील तर विखे पाटीलच देतील. पुढील दोन वर्षांत निमगावजाळीचा प्रत्येक कानाकोपरा पाण्याखाली आणू,” असा जनतेसमोर शब्द दिला.
0 Comments