संजय वैरागर यांना न्याय द्या” – नेवासात लहुजी सेना व बहुजन समाज रस्त्यावर

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

नेवासा – नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर झालेल्या क्रूर आणि अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ दि. २९ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वाजता नेवासा येथे भारतीय लहुजी सेना आणि नवबौद्ध बहुजन समाजाच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना आणि बहुजन नेत्यांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही गावगुंडांनी संजय वैरागर या तरुणाला उचलून नेऊन त्याच्यावर अमानुष अत्याचार केले. त्याच्या पायावर मोटरसायकल घालून हातपाय मोडले, तसेच चाकूने डोळ्यावर वार करून त्याचे डोळे निकामी केले. एवढेच नव्हे तर त्याच्या शरीरावर लघवी करण्यासारखे घृणास्पद कृत्य करण्यात आले, जे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली असून, फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आरोपींवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. त्यात बहुजन नेते संजय वालेकर, भेंडा ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब गजरे, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राज्य प्रमुख सुरेशराव आढागळे, राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे, दादासाहेब वैरागर सोनाई जिल्हा अध्यक्ष शांतवन खंडागळे. महिला आघाडी अध्यक्ष ज्योती भोसले,  तालुका उपाध्यक्ष दासु आढागळे संजय क्षीरसागर, सोप्निल सोनकांबळे आविनाश आढागळे बंटी पवार लहुजी सेनेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट आणि किशोर आढागळे आशोक साळवे सत्यवान खंडागळे सागर आढागळे बबलु आढागळे आदींचा समावेश होता.

आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश पाटील यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही, याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. आंदोलनानंतर लहुजी सेना आणि नवबौद्ध बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. त्यांनी चेतावणी दिली की जर आरोपींवर लवकरात लवकर मकोका कायद्यान्वये कारवाई झाली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.

Post a Comment

0 Comments