शिर्डी विमानतळाचे सर्व प्रश्न 31 मार्चपर्यंत सोडवावेत व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नाईट लँडिंग सुरू करावी--विमानतळ आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी‌  विमानतळाचे राहिलेले काही काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पुर्ण करावेत,  शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न 31 मार्चपर्यंत सोडवावेत व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नाईट लँडिंग सुरू करावी. अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.   
  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमु
ख उपस्थिती होती. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नुकतेच शिर्डीला विमानाने आले होते .त्यांनी विमानतळावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर राज्यातील विमानतळा संदर्भात नुकतीच  हि बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पुढे बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की,, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश ५ ट्रीलीयन इकॉनोमी कडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.याक्षेत्रातील बारीक बारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करा. शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा.
जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा,पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा.पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असुन अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.नवी मुंबई विमानतळ 85% पूर्ण झाले आहे. मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमता असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या.
ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. तेथेही काही अडचणी येत असल्याचे समजले आहे.काही विमानतळाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे.उशीर का होत याचे कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावेत. असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सह सचिव रुबिना अली, असंगबा चुबा एओ, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments